Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. तसेच त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली.

आता ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कराकडून काही व्हिडीओ शेअर करण्यात येत आहेत. त्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीने राबवलं? दहशतवादी तळांना कशा प्रकारे उद्ध्वस्त केलं? या संदर्भातील माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराबाबत बोलताना भारतीय सैन्याच्या एका जवानाने या संपूर्ण कारवाईचं वर्णन करताना भारताने पाकिस्तानी गोळीबाराला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं? या विषयी थोडक्यात सांगितलं आहे. ‘गोली उन्होंने चलाई, पर धमाका हमने किया’, असं या जवानाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

भारतीय सैन्याच्या जवानाने नेमकं काय सांगितलं?

“ऑपरेशन सिंदूर ही कोणती प्रतिक्रिया नव्हती, तर एक नियोजनबद्ध आणि एक टार्गेट ठेवून केलेला स्ट्राईक होता. यामध्ये आमचा हेतू अगदी स्पष्ट होता की आम्हाला शत्रूच्या दहशतवादी तळांना आणि घुसखोरीला मदत करणाऱ्या चौक्या नष्ट करायच्या होत्या. आम्ही यासाठी पूर्णपणे तयार होतो. मानसिक, धोरणात्मक दृष्ट्या आणि लॉजिस्टिक दृष्ट्या, आमच्याकडे स्वदेशी प्रगत रडार प्रणाली आणि विविध लक्ष्य साधणाऱ्या प्रणाली होत्या. तसेच याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सैनिकांचा उत्साह”, असं या जवानाने सांगितलं आहे.

दरम्यान, तसेच भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यावर भर दिला होता. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात ९ दहशतवादी स्थळांना लक्ष्य करत उद्ध्वस्त करण्यात आल्याचंही जवानाने सांगितलं. तसेच पाकिस्तानकडून गोळीबार झाला, पण मी अभिमानाने सांगू शकतो की आपली कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमचं ध्येय दहशतवादी तळं नष्ट करणं हेच होतं. जेव्हा त्यांनी आमच्या नागरी क्षेत्राला आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली होती, तेव्हाच आमचं स्पष्ट ठरलं होतं हो की जर त्यांनी आमच्या नागरी क्षेत्रांत किंवा लष्करी छावण्यांना लक्ष्य केलं तर आम्ही त्यांची देखील चौकी नष्ट करू”, असंही जवानाने सांगितलं.

‘हा गोळीबार पाकिस्तान दशकांपर्यंत लक्षात ठेवेल’

पाकिस्तानी गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तराची आठवण करून देताना दुसऱ्या एका सैनिकाने सांगितलं की, “जेव्हा पाकिस्तानने युद्धबंदीचं उल्लंघन केलं आणि आमच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमचं प्रत्युत्तर खूप चोख आणि अचूक व प्रभावी होतं. तोफातून गोळीबार केलेला प्रत्येक गोळीबार अतिशय अचूक होता. त्यामुळे आम्ही त्यांचं टार्गेट निष्प्रभ केलं. तसेच शत्रूचं खूप नुकसान झालं आणि त्यांच्या छावणीत आणि लष्करी तळावर खूप दहशत पसरली होती. त्यामुळे शत्रू हा गोळीबार अनेक दशकांपर्यंत लक्षात ठेवेल.”