अमेरिकेतील ९/११ हल्ल्याची सूत्रधार दहशतवादी संघटना असलेल्या ‘अल कायदा’ने आता भारतीय उपखंडात आपल्या कारवाया सुरू करण्याचा इशारा दिला आहे. भारत, बांगलादेश आणि म्यानमार या देशांत हल्ले घडवण्यासाटी अल कायदाने ‘कायदात अल जिहाद’ हा गट तयार केला असल्याचे या संघटनेचा प्रमुख अयमान अल जवाहिरी याने ध्वनीचित्रफितीद्वारे म्हटले आहे.
भारतात पुन्हा एकदा धर्मयुद्ध छेडण्याचा तसेच देशात पुन्हा एकदा इस्लामिक राज्याची प्रतिष्ठापना करण्याचा अल कायदाचा मानस असून भारतीय उपखंडात शरिया लागू करण्यासाठी अल कायदा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने दिला आहे. अल कायदाच्या अधिकृत प्रसिद्धी करणाऱ्या सहाब या संस्थेने ही चित्रफित जारी केली असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
या बाबतचे वृत्त समजताच गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह एका बैठक घेतली. अल कायदातर्फे जारी करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफितीची सत्यासत्यता गुप्तचर खात्याकडून पडताळण्यात येत आहे. मात्र, सर्व राज्यांनी आणि संरक्षण दलांनी आवश्यक ते खबरदारीचे उपाय तातडीने योजावेत अशा सूचनाही गृह मंत्रालयातर्फे देण्यात आल्या आहेत.