पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ हा अमृतकाळ असल्याचे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे ऐकले का? असा सवालही कोश्यारींनी केला. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

गुलामीचा अंश काढून टाका, वारशाप्रती अभिमान असावा; विकसित देशाच्या स्वप्नासाठी मोदींनी दिला ‘पंचप्राण’चा मंत्र

गैरमार्गाने प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी काही नागरिक तगादा लावत असल्याचे यावेळी कोश्यारींनी सांगितले. भ्रष्टाचार संपवण्यासाठी थेट ग्रामपंचायत आणि सरपंचाच्या खात्यावर निधी दिला जात असल्याचे या कार्यक्रमात कोश्यारी म्हणाले. देशातून भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. येत्या २५ वर्षात आपल्याला भारताला विश्वगुरू बनवायचे आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाला परिश्रम करावे लागणार आहेत. राष्ट्र निर्माणासाठी प्रामाणिकपणाची आणि समर्पणाची भावना ठेवावी लागणार आहे. या राष्ट्रकार्यासाठी जनतेने पंतप्रधानांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन कोश्यारी यांनी यावेळी केले.

पंतप्रधान मोदींचे क्रीडा क्षेत्रातील घराणेशाहीबद्दल मोठे वक्तव्य; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केला उल्लेख

या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानावर देखील भाष्य केले. देशात आज घरोघरी तिरंगा फडकत आहे. हा तिरंगा मोदींचा नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. हा तिरंगा राष्ट्राचे प्रतिक आहे, असे कोश्यारी यांनी यावेळी म्हटले.