गुजरातमधील एका ५० वर्षीय मच्छिमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. या मच्छिमाराला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एका वर्षापूर्वी समुद्रातून अटक केली होती. या मच्छिमाराच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलं नसून अज्ञात कारणांमुळे त्याचा तुरुंगात मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. जयंती सोलंकी असे मृताचे नाव असून तो गीर-सोमनाथ जिल्ह्यातील सुत्रापाडा गावातील रहिवासी होता. जयंतीचा काही आठवड्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु रविवारी स्थानिक अधिकार्यांना माहिती मिळाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. वेरावळ येथील गुजरात मत्स्यव्यवसाय विभागाचे एक पथक मच्छिमाराचा मृतदेह घेण्यासाठी पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवर पोहोचले आहे, असे मत्स्यव्यवसाय अधिकारी विशाल गोहेल यांनी सांगितले. "आमची टीम आधीच अटारी-वाघा बॉर्डरवर पोहोचली आहे. आम्हाला आशा आहे की आज रात्रीपर्यंत मृतदेह आमच्याकडे सुपूर्द केला जाईल. पार्थिव इथे परत आणून सुत्रापाडा येथे कुटुंबीयांना सुपूर्द केले जाईल," असं गोहेल यांनी सांगितलं. पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातून सोलंकी यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारने गुजरात मत्स्य विभागाला पुढील प्रक्रिया करण्यास सांगितले. सोलंकी हा दीव आणि दमण आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील वनकबारा गावचा मूळ रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एक वर्षापूर्वी त्याला अरबी समुद्रातील IMBL (आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा) जवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सी (PMSA) ने अटक केली होती, जेव्हा तो इतर मच्छिमारांसह "रसूल सागर" बोटीवर बसला होता, असं गोहेल यांनी सांगितलं. "सोळंकी हा मूळचा वनाकबारा येथील रहिवासी असला तरी, तो गेल्या अनेक वर्षांपासून सुत्रापाडा येथे आपल्या कुटुंबासह आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होता. त्याच्या अटकेनंतर गेल्या एक वर्षापासून तो पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. काही आठवड्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. परंतु, आम्हाला रविवारी माहिती मिळाली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप आम्हाला कळू शकलेले नाही,” असे गोहेल म्हणाले.