गुजरातच्या मोरबीमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत १३२ हून जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. या भीषण घटनेबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मच्छू नदीवरील हा पूल जवळपास सात महिन्यांआधी दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर २६ ऑक्टोबरला हा पूल मोरबी नगरपालिकेच्या ‘फिटनेस’ प्रमाणपत्राशिवाय पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यावर्षी मार्चमध्ये मोरबीतील ‘ओरेवा’ (अजंता मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि.) समुहाला या पुलाची दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे कंत्राट मोरबी नगरपालिकेकडून देण्यात आले होते. ही कंपनी ई-बाईकचीदेखील निर्मिती करते.

Morbi Bridge Collapsed: मृतांची संख्या १३२ वर, १७७ जणांना वाचवण्यात यश; बचावकार्य अद्यापही सुरु

“हा पूल मोरबी नगरपालिकेची मालमत्ता आहे. या पुलाची दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे कंत्राट ‘ओरेवा’ समुहाला १५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले होते. या कंपनीने नगरपालिकेला माहिती न देताच हा पूल पर्यटकांसाठी खुला केला होता. त्यामुळे आम्ही पुराचे सुरक्षा ऑडिट करू शकलो नाही”, अशी माहिती मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंह झाला यांनी दिली आहे.


दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीने हा पूल नागरिकांसाठी खुला केला होता. या पुलाला अद्याप मोरबी नगपालिकेकडून ‘फिटनेस’ प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही, असे झाला यांनी सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ –

“या दुर्घटनेच्या अधिक माहितीची आम्ही वाट पाहत आहोत. प्रथमदर्शनी, पुलाच्या मध्यभागी बरेच लोक एका बाजूने पुलाला हलवण्याच्या प्रयत्न करत होते”, अशी माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया ‘ओरेवा’ समुहाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

१०० वर्षांपूर्वी युरोपातील तत्कालीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हो पूल बांधण्यात आला होता. दरबारगड पॅलेस आणि लखधीर्जी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जोडणारा हा पूल १.२५ मीटर रुंद होता. २३३ मीटरमध्ये विस्तारीत हा पूल गुजरातच्या पर्यटकांमध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू होता. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा सर्वाधिक समावेश आहे. या घटनेच्या तपासासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.