शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचे १६ वे वंशज बाबा सुखदेव सिंग बेदी गुरुवारी सायंकाळी घुमानमध्ये दाखल झाले. साहित्य संमेलनाच्या शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात सुखदेव सिंग यांच्यासह अन्य १३ जणांना ‘भक्त नामदेव जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संमेलनस्थळी बाबा सुखदेव सिंग बेदी यांची भेट घेतली असता ‘लोकसत्ता’शी बोलताना ते म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि पंजाब या दोन वेगळ्या संस्कृती एकत्र येत आहेत, याचा विशेष आनंद आहे.गुरू नानक यांनी त्या काळी ‘मोहब्बत सब से, नफरत ना किसी से’ असा संदेश दिला होता. आपली सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता गुरू नानक यांच्या या विचारांची सद्य:स्थितीत जास्त गरज आहे. परस्पर बंधुत्व, विश्वास आणि माणसाला माणूस म्हणून वागविणे आणि आपल्याशी तशी कृती करणे गरजेचे असल्याचे बाबा सुखदेव सिंग यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नांदेड येथील नानकसाई फाऊंडेशनने नांदेडहून घुमान येथे दिंडी आणली आहे.