गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसकडून देण्यात आलेली ऑफर नाकारली आहे. सध्या गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी संपूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. त्यासाठी काँग्रेसकडून भाजपविरोधी गटांना एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने हार्दिक पटेलसमोर पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हार्दिक पटेलला निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेस त्याला तिकीट देण्यास तयार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारत सोळंकी यांनी म्हटले होते. मात्र, हार्दिकने काँग्रेसच्या या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला आहे. घटनात्मकदृष्ट्या मी निवडणूक लढवू शकत नाही. त्याची काही गरजही नाही. मात्र, भाजपच्या विरोधात सर्वांनी एकटवण्याची गरज आहे. ही निवडणूक केवळ भाजप-काँग्रेस यांच्यापुरती मर्यादित नसून राज्यातील ६ कोटी जनता त्यामध्ये सहभागी होणार आहे, असे हार्दिक पटेलने म्हटले. काही दिवसांपूर्वीच गुजरात सरकारकडून हार्दिकविरोधातील तिरंग्याच्या अपमानाचा खटला मागे घेण्यात आला होता.

दरम्यान, काँग्रेसने गुजरातमध्ये बिहारच्या धर्तीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, संयुक्त जनता दलाचे बंडखोर आमदार छोटू वासवा, दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवानी यांना आघाडीत सामील करुन घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केल्याचे समजते. गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात होणारी निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. तर सरकारविरोधी लाटेचा फायदा घेऊन भाजपचा पराभव करण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. बिहारच्या धर्तीवर गुजरातमध्येही भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसने संयुक्त जनता दलाचे बंडखोर आमदार छोटू वासवा यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. राज्यसभा निवडणुकीत छोटू वासवा यांनी भाजपऐवजी काँग्रेसचे अहमद पटेल यांना मतदान केले होते. वासवा हे जदयूचा गुजरातमधील चेहरा असून, आदिवासी समाजाचे नेते म्हणून ते ओळखले जातात. वासवा हे शरद यादव गटातील असून, लवकरच ते महाआघाडीबाबत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतील असे समजते. संयुक्त जनता दलाच्या आमदारासह पाटीदार समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या हार्दिक पटेल यांचाही महाआघाडीत समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय दलित चळवळीतील नेते जिग्नेश मेवानी, ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकूर यांचीदेखील काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गुजरातमध्येही महाआघाडी झाल्यास भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसेल असे जाणकारांचे मत आहे.

भाजप किती जागा जिंकणार हाच कळीचा मुद्दा