पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने पुन्हा भाजपावर टीकेची तोफ डागली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताला आवश्यक असणारी संख्या गाठण्यात अपयश आले आहे. पण सध्या तिथे घोडेबाजाराची मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केला असली तरी भाजपाने त्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. हाच धागा पकडून हार्दिकने भाजपावर हल्लाबोल केला आहे. अप्रामणिकपणा आणि पैशांच्या जोरावर भाजपाने सरकार बनवले तर ती देशभक्ती ठरते. तर काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केले तर ती लोकशाहीची हत्या असते. कमाल आहे, तुम्ही केली तर लीला आणि दुसऱ्याने केली तर चोरी, असे उपहासात्मक ट्विट हार्दिकने केले आहे.

कर्नाटकात भाजपाचे संख्याबळ १०४ वर जाऊन थांबले आहे. त्यांना बहुमतासाठी ११३ आकडा पार करायचा आहे. दुसरीकडे काँग्रेस (७८) आणि जेडीएस (३७) यांची एकत्रित संख्याही बहुमताच्या आकड्याच्या पुढे जाते. पण ही भाजपाला ही आघाडी रूचत नसल्याचे त्यांच्या वर्तणुकीवरून दिसते. भाजपा नेतृत्वाकडून याप्रकरणी टीकाही होत आहे. याच मुद्द्यावरून हार्दिकने भाजपावर निशाणा साधला. भाजपा करेल त्या लीला आणि दुसऱ्याने केली तर चोरी असते असे त्याने म्हटले.

तत्पूर्वी, त्याने एका चित्रपटातील संवादाचा आधार घेऊन अमित शाह आणि सिद्धरामय्या यांच्यावर भाष्य केले होते.
अमित शाह: सरकार स्थापन करण्यासाठी सिद्धरामय्याजी तुमच्याकडे काय आहे ??
सिद्धरामय्या: आमच्याकडे जेडीएसची साथ आहे. तुमच्याकडे काय आहे !!
अमित शाह: आमच्याकडे राज्यपाल आहेत, सीबीआय आहे, अप्रामाणिकपणा आहे, आयकर विभागाचे अधिकारी आहेत आणि हे सर्वजण आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लावले आहेत.