बंडखोर आमदारांच्या घराबाहेर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करणाऱ्या केंद्र सरकारवर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी टीका केली आहे.

आमदारांच्या घराबाहेर सुरक्षारक्षक उभे करणे ही बाब अनाकलनीय आहे. राष्ट्रपती राजवट लागू असताना केंद्राचे हे वर्तन विचित्र आहे, असे रावत म्हणाले. नवी दिल्लीत अनेक महत्त्वाच्या व्यक्ती सातत्याने येत असतात त्यांची चौकशी करण्याची गरज असताना केंद्र दुसऱ्याच ठिकाणी सुरक्षारक्षक नेमत असल्याचे सांगत रावत यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे उत्तराखंडचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा रावत यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने सरकार अस्थिर असल्याचे कारण पुढे करत नुकतीच उत्तराखंडमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार हल्ला केला होता.