हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात बोलेरो गाडीत दोन युवकांना जिवंत जाळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हो दोन युवक राजस्थानमध्ये राहणारे होते. त्यांच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, त्यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना जिवंत जाळले गेले. जळालेल्या बोलेरो गाडीत अतिशय छिन्न-विछिन्न अवस्थेत हे मृतदेह मिळाले. मृत युवकांच्या कुटुंबियांनी यासंबंधी बजरंग दलावर गंभीर आरोप केले आहेत. हरियाणा पोलिसांनी चौकशी सुरु केली असून याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नासिर (वय २५) आणि जुनैद उर्फ जुना (वय ३५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील घाटमीका गावातील रहिवासी आहेत. बुधवारी त्यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी भिवानीमधील लोहारू या गावी जळालेल्या बोलेरो गाडीत आढळून आले.

हे वाचा >> “अदाणी प्रकरणामुळे भारताच्या विश्वासहार्तेला तडा, मोदींना उत्तर द्यावेच लागेल”, अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची प्रतिक्रिया

भरतपूरचे पोलीस अधिक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, पीडित युवकांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गोपालगड पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. भिवानी जिल्ह्यात मिळालेली गाडी ही भरतपूरमधून बेपत्ता झाली होती. तसेच मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. मृत यवुकांपैकी जुनैदची गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे. या घटनेत गोरक्षकांचा काही हात आहे का? असा प्रश्न स्थानिक माध्यमांनी विचारला असता पोलिसांनी यावर उत्तर देणे टाळले. हा तपासाचा भाग असून आम्ही त्याच्या खोलात जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, ज्या पाच जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका व्यक्तीचा बजरंगदलाशी संबंध आहे. मोहित यादव उर्फ मोनू मानेसर असे त्याचे नाव आहे. मोहित यादवने मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारीत करत त्याच्यावर झालेले आरोप नाकारले आहेत. या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्याने केली आहे.

हे वाचा >> “आदिल मुस्लीम आहे म्हणून कितीही लग्न करु शकतो, पण…”, तिहेरी तलाकचा उल्लेख करत राखी सावंत म्हणाली “मोदीजी…”

जुनैदचा चुलत भाऊ इस्माइलने बुधवारी गोपालगड येथे मृत युवकांचे अपहरण आणि त्यांना मारहाण झाल्याची तक्रार नोंदवली होती. इस्माइलने सांगितले की, बुधवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चुलत भाऊ जुनैद आणि नासीर आपली बोलेरो गाडी घेऊन कामासाठी बाहेर पडले. त्यानंतर ते परत आलेच नाहीत. “८ ते १० लोक जुनैद आणि नासीरला मारहाण करुन बोलेरो गाडीतून पीरूका गावाच्या जंगलाच्या दिशेने नेत होते, अशी माहिती गावातील एका चौकात चहाच्या दुकानावर उभ्या असलेल्या लोकांनी दिली. असा जबाब इस्माइलने नोंदवला. तसेच त्यानंतर दोघांनाही फोन लावला असता त्यांचे फोन बंद होते. आम्ही जेव्हा नातेवाईकांसोबत पीरूकाच्या जंगलात गेलो तेव्हा तिथे गाडीच्या फुटलेल्या काचा आढळून आल्या, असेही इम्साइलने सांगितले.