भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी सांगितले की, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेला व्याजदर दर वाढवावे लागतील आणि या दरवाढीकडे राजकारणी आणि नोकरदारांनी “देशविरोधी” पाऊल म्हणून पाहू नये. आपल्या परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजन यांच्या मते, ‘महागाई विरोधातील लढाई’ कधीच संपत नाही, हे लक्षात ठेवायला हवे.

‘लिंक्ड इन’ या सोशल नेटवर्किंग साइटवर त्यांनी लिहिले की, “भारतात महागाई वाढत आहे. काही क्षणी आरबीआयला जगातील इतर देशांप्रमाणे व्याजदर वाढवावे लागतील.” अन्नधान्याच्या किंमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे मार्चमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर १७ महिन्यांच्या उच्चांकी ६.९५ टक्क्यांवर पोहोचला. हे RBI च्या समाधानकारक पातळीपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, कच्च्या तेल आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये १४.५५ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

तसेच “राजकारणी आणि नोकरदारांनी हे समजून घेतले पाहिजे की दर वाढ करणे ही देशविरोधी कृती नाही, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना फायदा होईल. त्याऐवजी, आर्थिक स्थैर्यासाठी उचललेले हे पाऊल आहे, ज्याचा देशाला सर्वाधिक फायदा होतो.” असेही राजन यांनी सांगितले आहे. ते सध्या सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस विद्यापीठात प्राध्यापक आहेत.