लग्नघरातून परतणाऱ्या वऱ्हाडींची गाडी दरीत कोसळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सिरमौर जिल्ह्याच्या पौंटा साहिब भागामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. नेमकी ही गाडी कुठून कुठे जात होती, त्यामधल्या प्रवाशांची ओळख काय याविषयी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

 

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, पच्छड विभागाच्या बाग पाशेंग या डोंगराळ भागामधून जात असताना वऱ्हाडींना घेऊन जाणारी एक पिकअप व्हॅन दरीत कोसळली. अद्याप या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांची ओळख पटलेली नसून जखमी झालेल्या ३ व्यक्तींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पौंटा साहिपचे पोलीस उपअधीक्षक बीर बहादूर यांनी दिली आहे.

मावळ : मुलाचं सेल्फी काढणं वडील आणि मामांच्या जिवावर बेतलं; कुंडमळ्यात सापडले मृतदेह!

दरम्यान, चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे ही गाडी थेट घाटातून खाली येऊन कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. यासंदर्भात नेमकं अपघाताचं कारण आणि मृतांची ओळख यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.