Pahalgam Attack : २२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्याला एक महिनाही पूर्ण व्हायचा आहे. दरम्यान नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या लग्नाला अवघे सात दिवस झाले होते. ते मधुचंद्रासाठी काश्मीरला आले होते. त्यांनाही दहशतवाद्यांनी ठार केलं. यानंतर आता विनय नरवाल यांच्या पत्नीला म्हणजेच हिमांशी नरवालला ट्रोल करण्यात येतं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत निषेध नोंदवला आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्यावर दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळी झाडली. विनय आणि हिमांशी यांच्या लग्नाला अवघे सात दिवसच झाले होते आणि ही धक्कादायक घटना घडली. ज्यानंतर हिमांशी विनयच्या मृतदेहाजवळ विषण्ण अवस्थेत बसून होती. हा फोटोही व्हायरल झाला होता. तसंच पतीच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्याला अखेरचा निरोप देतानाही हिमांशी रडली होती. मात्र काही दिवसांपासून हिमांशीला ट्रोल केलं जातं आहे. हिमांशीने एक वक्तव्य केलं होतं. ज्यात ती म्हणआली होती की ज्यांनी माझ्या पतीची हत्या केली त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. मात्र त्या घटनेमुळे मुस्लिम समुदाय किंवा काश्मिरी नागरिक यांना कुणी लक्ष्य करु नये. हिमांशी नरवालच्या याच प्रतिक्रियेमुळे तिला ट्रोल केलं जात होतं. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. हिमांशीला अशा प्रकारे ट्रोल करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

हिमांशी नरवाल यांचा या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

विजया रहाटकर काय म्हणाल्या?

काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ठार केलं. या हल्ल्याच्या वेळी लेफ्टनंट विनय नरवाल यांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं. दहशतवाद्यांनी जो मृत्यूचा क्रूर खेळ तिथे खेळला त्यामुळे संपूर्ण देश क्रोधात आहे. यानंतर हिमांशी यांनी जी प्रतिक्रिया दिली ती कदाचित लोकांना आवडली नसावी. पण यासाठी त्यांना ट्रोल केलं जाणं दुर्दैवी आहे. तुम्हाला विरोध दर्शवायचा असेल तर त्याच्याही काही विशिष्ट संविधानिक पद्धती आहेत. कुठल्याही महिलेच्या किंवा व्यक्तीच्या वैचारिक स्वातंत्र्यावर कुणीही गदा आणू शकत नाही. त्यामुळे हिमांशी नरवाल यांचं ट्रोलिंग योग्य नाही असं मला वाटतं असं रहाटकर म्हणाल्या आहेत.

हिमांशी नरवाल कोण आहे?

२४ वर्षीय हिमांशी नरवाल ही पीएचडी स्कॉलर आहे आणि एक शिक्षक आहे. हिमांशी मूळची गुरुग्रामची आहे. हिमांशीचे वडील सुनील कुमार एक्साईज विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तर तिची आई पूनम गृहिणी आहेत. हिमांशी नरवाल सोशल मीडियावरही सक्रिय असते. १ मे रोजी विनय नरवाल यांचा वाढदिवस होता. पण तो साजरा करण्याआधीच विनय नरवाल हे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. या दिवशी म्हणजेच १ मेच्या दिवशी हिमांशीने रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं. यावेळी बोलत असताना माझे पती विनय नरवाल यांना ज्यांनी ठार केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण त्यामुळे काश्मिरी नागरिक किंवा सगळ्या मुस्लिमांना दोषी धरता कामा नये या आशयाचं एक विधान तिने केलं होतं. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं.