निवडणूक आयोगाने शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय देत एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली. हा निर्णय नाही तर २ हजार कोटी रूपये देऊन केलेलं डील आहे अशीही टीका संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याविषयी एक अजब वक्तव्य केलं आहे. भगवान शंकराबाबत राजकारण केल्याने उद्धव ठाकरे पक्ष आणि चिन्हाची लढाई हरले देवावर राजकारण केल्याने उद्धव ठाकरे हे पक्ष आणि चिन्हाची लढाई हरले आहेत. त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमवावं लागलं आहे. खरंतर भगवान शंकराचं सहावं ज्योतिर्लिंग अशी ख्याती असलेलं भीमाशंकर कुठे आहे यावरून दोन राज्यांमध्ये वाद आहे. भगवान शंकराचं वास्तव्य हिमालयात असतं. त्यांना कुठल्याही विशेष स्थानापर्यंत सीमित करता येणार नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष शंकराच्या नावावर राजकारण करतो आहे. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिरावलं गेलं आहे. गुवाहाटीतल्या भीमाशंकर धाम ज्योतिर्लिंग मंदिर यात्रेच्या दरम्यान सरमा यांनी असं म्हटलं आहे की भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचं स्थान हे शिव पुराणानुसार कामरूप प्रदेशात आहे. आसाम सरकारने यासंदर्भातली एक जाहिरात दिली होती ज्यावरून महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांमध्ये वाद झाला. जो वाद झाला त्या वादाची काही गरज नव्हती. भगवान शंकर भारतातल्या प्रत्येक भागांमध्ये आहेत. भारतीय सनातनी संस्कृतीची ताकद भागात पोहचली आहे. भीमाशंकर मंदिर या ठिकाणी हजरो वर्षापासून आहे. निवडणूक आयोगाने काय म्हटलं? निवडणूक आयोगाने शुक्रवारी निर्णय देत पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना केली. तसंच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडलं. त्यानंतर ५७ वर्षात पहिल्यांदा असं घडलं आहे की ठाकरेंपासून शिवसेना वेगळी झाली आहे.