काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या हिंदू पाकिस्तान या विधानावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दीक लढाई रंगली आहे. शशी थरुर आपल्या विधानावर ठाम असून त्यांच्या या विधानाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे. शशी थरुर यांच्या विधानावर वाद झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी फेसबुक पोस्ट लिहून आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

भाजपा आणि आरएसएसची हिंदू राष्ट्राची जी संकल्पना आहे त्यामध्ये पाकिस्तानचीच झलक आहे. मी याआधी सुद्धा बोललो आहे आणि आता सुद्धा तेच सांगेन भारत पाकिस्तानासारखा अल्पसंख्यांकांचा अधिकार दडपून टाकणारे देश बनू नये असे थरुर यांनी म्हटले आहे. मी नेमकी कशाबद्दल माफी मागावी ते समजत नाहीय. भाजपा, आरएसएसने हिंदू राष्ट्राची संकल्पना सोडून दिली असेल तर तसे त्यांनी जाहीरपणे कबूल करावे असे थरुर यांनी म्हटले आहे.

भाजपाने २०१९ सालची लोकसभेची निवडणूक जिंकली तर हिंदू पाकिस्तानच्या निर्मितीला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असे विधान करुन शशी थरुर यांनी या वादाला सुरुवात केली होती. थरुर म्हणाले होते की, जर भाजपाने २०१९च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या तर आपल्या लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होईल. संविधानातील सर्व मुलभूत तत्वे काढून टाकण्यात येतील तसेच नवे संविधान निर्मितीचे काम सुरु होईल.

त्यामुळे तयार झालेले नवे राष्ट्र हे हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतांवरच चालेल. यामुळे अल्पसंख्यांकांमधील समानता नष्ट होईल. हे दिवस पाहण्यासाठीच महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद आणि इतर महान नेत्यांना स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला होता का?, असा सवालही त्यांनी विचारला. थरुर यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. शरुर यांचे विधान हिंदूंचा अपमान करणारे असून भारताचीही त्यांनी लाज काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.