Pakistani Hindus In India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून सरकाने पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश दिले आहे. जशी जशी भारत सोडण्याची मुदत जवळ येत आहे, तशी तशी ज्या पाकिस्तानी नागरिकांना परत जायचे नाही त्यांची चिंता वाढली आहे. यातील काहीनी तर, “पाकिस्तानसारख्या नरकात जाण्यापेक्षा भारतात मरण आलेले बरे”, असे म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित संघटनेच्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी रविवारीची मुदत दिली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक हिंदू निर्वासितांना पाकिस्तानात परतावे लागल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील धार्मिक छळामुळे भारतात आश्रयास आलेल्या नागरिकांना वाटते की, पाकिस्तानात परतणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

नरकात परत जाण्यापेक्षा मी भारतात मरण पत्करेन

राजस्थानमधील जैसलमेरमधील निर्वासितांच्या एका छावणीत, अटारी सीमेवरून भारतात प्रवेश केलेली अनेक कुटुंबे आहेत. मूलसागर गावातील ‘एकलव्य भिल बस्ती’मध्ये पाकिस्तानातून अल्पकालीन व्हिसावर भारतात आलेले हजाराहून अधिक हिंदू निर्वासित कुटुंबे राहतात.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी खेतो राम सततच्या छळामुळे पाकिस्तान सोडून भारतात आले होते. मंगळवारी पहलगाम हल्ला होण्याच्या काही तास आधीच ते आणि त्यांचे कुटुंब भारतात आले होते.

एनडीटीव्हीशी बोलताना खेतो राम म्हणाले की, “या हल्ल्यामुळे मी खूप संतापलो आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, पाकिस्तानसारख्या नरकात परत जाण्याचा विचाराने मी अस्वस्थ आहे. पाकिस्तासारख्या नरकात परत जाण्यापेक्षा मी भारतात मरण पत्करेन.”

१९१ हून अधिक पाकिस्तानी नागरिक परतले

दरम्यान, पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील अमृतसरमधील अटारी-वाघा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे पाकिस्तानात परत जा आहेत. आतापर्यंत १९१ हून अधिक पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत. तर २८७ हून अधिक भारतीय नागरिकी पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका नेपाळी नागरिकाचाही समावेश आहे. पहलगाममधील रस्त्याच्या कडेला असलेल्या बैसरन या कुरणात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता.