मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. अशातच आज सकाळी बातमी आली ती देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याची. देवेंद्र फडणवीस हे अयोध्येला जाणार अशी काहीही माहिती आधी नव्हती. मात्र ते अयोध्येत पोहचले आहेत. यामागे काही राजकीय समीकरण आहे की अजून काही या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. अशातच लखनऊ या ठिकाणी पोहचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिलं आहे. काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी? "माझं रामजन्मभूमीशी नातं आहे. या ठिकाणच्या अनेक आठवणी माझ्या मनात आहेत. रामलल्लांचं दर्शन घेण्याची इच्छा माझ्या मनात होतीच. खूप दिवस मी ठरवत होतो. आमच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीची मिटिंग दिल्लीत आहे तरीही मी अयोध्येत आधी आलो आणि इथून दिल्लीत जाणा आहे. रामजन्मभूमीच्या आंदोलनाशी मी जोडलेलो होतो. प्रत्येक कारसेवेला मी उपस्थित राहिलो. मनपासून मला आनंद होतो आहे की या ठिकाणी मला आज येता आलं. " असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. शरद पवारांच्या टीकेला उत्तर राज्यात अवकाळीचं संकट आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. अशी टीका शरद पवारांनी केली. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचंही उत्तर दिलं. टीका करणं हे त्यांचं कामच आहे. राज्यकारभार कसा चालवायचा हे प्रभू रामचंद्राने सांगितलं आहे. प्रभू राम हे आमचे आदर्श आहेत. आम्हाला त्यांच्याबाबत आस्था आहे. महात्मा गांधी यांची संकल्पनाही रामराज्याचीच होती. रामराज्याची संकल्पना राबवायाची असेल तर रामाचे दर्शन घेतलंच पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा एकनाथ शिंदे यांच्यासह मी अयोध्येत आल्याचा मला आनंद आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना ही एकनाथ शिंदेंसोबत आहे. कारण वारसा हा जन्माने मिळत नाही कर्माने आणि विचारांनी मिळतो. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांची १०० टक्के नैसर्गिक युती आहे. त्याच युतीचा उत्साह या ठिकाणी पाहण्यास मिळतो आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.