गुलाब चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत धडकणार असल्याने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, चक्रीवादळ ओडिशाच्या गोपालपूर आणि आंध्र प्रदेशच्या कलिंगपटनम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. आयएमडीने इशारा दिला आहे की, ९५ किलोमीटर प्रतितासापर्यंत वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. तर, चक्रीवादळाला नावं कशी दिली जातात, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? किंवा या चक्रीवादळाचं नाव गुलाब का ठेवण्यात आलंय आणि हे नाव कुणी दिलंय, हे तुम्हाला माहितीए का? तर, 'गुलाब' चक्रीवादळाला पाकिस्तानने नाव दिलं असून या नावाचा उच्चार "गुल-आब" असा केला जावा, अशी अधिकृत सूचना आयएमडीकडून देण्यात आली आहे. गुलाब हे नाव चक्रीवादळाच्या नावांच्या यादीतून घेण्यात आलंय. ही यादी जागतिक हवामान संस्था/संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर एशिया आणि पॅसिफिक (WMO/ESCAP) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) द्वारे तयार केली जाते. पॅनेलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या १३ देशांचा समावेश आहे. हे १३ देश या प्रदेशातील चक्रीवादळांना नावे देतात. नावे निवडताना ती सोपी बघून आणि त्याचा दुसरा वादग्रस्त अर्थ नाही ना, हे लक्षात ठेवून निवडली जातात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नाव राजकारण, राजकीय व्यक्ती, धार्मिक विश्वास, संस्कृती आणि लिंग यांच्यासाठी सारखं असावं. अम्फान, चक्रीवादळ जे मे २०२० मध्ये भारताला धडकले होते, ते २००४ मध्ये तयार केलेल्या यादीतील शेवटचे नाव होते. तब्बल आठ देशांनी प्रत्येकी ८ नावं देऊन ६४ नावांची यादी तयार करण्यात आली होती. २०१८ मध्ये या गटात आणखी पाच देशांचा समावेश करण्यात आला आणि यादीचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर या १३ देशांनी प्रत्येकी १३ नावे सुचवली असून या यादीत चक्रीवादळांची १६९ नावे आहेत. या वर्षी गुजरात किनाऱ्यावर धडकलेले चक्रीवादळ तौक्ते चक्रीवादळाचे नाव यादीतून घेतले गेले होते आणि ते नाव म्यानमारने सुचवले होते.