हैदराबादमधील बलात्कार प्रकरण काही दिवसांपासून चर्चेत होते. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ठार करण्यात आले. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी ठार झाले. या चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

“भविष्यात ‘असं’ दुष्कृत्य करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे”

हैदराबाद प्रकरणात आरोपी असणारे चार जण पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला, पण बहुतांश भारतीयांनी पोलिसांचे कौतुक केले. भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने देखील पोलिसांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. “आज सकाळी सकाळी मनाला सुखावणारी बातमी मिळाली. हैदराबादमध्ये झालेली चकमक म्हणजे कायद्याच्या रक्षकांनी समाजातील राक्षसांवर मिळवलेला विजय आहे. पोलीस विभागाला कोटी-कोटी प्रणाम. निर्णय घेण्याची पद्धत कोणतीही असो, पण जे झाले ते प्रशंसनीय आहे”, असे ट्विट करत त्याने पोलिसांचे कौतुक केले.

पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपी मारले गेले आहेत, ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला. पण या प्रकरणातील आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

“पोलिसांनो, तुम्हाला सलाम!”; सायनाची हैदराबाद घटनेवर प्रतिक्रिया

संपूर्ण देशात या प्रकरणाबाबत संतापाची लाट होती. आम्ही मुख्यमंत्र्यांना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते, तर पुन्हा अशी घटना घडली असती. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.