पंजाबच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फोन करुन आपल्याला सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, "सोनिया गांधी यांनी मला सकाळी फोन केला पण मी तो उचलू शकलो नाही. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला आणि हे सगळं काय चाललंय याबद्दल विचारणा केली आणि अशा परिस्थितीत मी राजीनामा देणं योग्य आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या की ठीक आहे, द्या तुम्ही राजीनामा आणि त्यानंतर त्या म्हणाल्या सॉरी अमरिंदर". 'I am sorry Amarinder', said Congress President Sonia Gandhi after I spoke with her over my resignation, this morning: Amarinder Singh after resigning as Punjab Chief Minister pic.twitter.com/ESYXKPOHJO — ANI (@ANI) September 18, 2021 अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत दाखल होत आहे. मात्र राहुल गांधी यांचे आप्त, माजी खासदार आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय पंजाब सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या पदासाठी चरणजीत सिंग चन्नी, राजकुमार वेरका तसंच सुखजिंदर सिंग रंधावा यांची नावे समोर येत आहेत. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक दलित समुदायातील असेल अशीही माहिती मिळत आहे.