मी काहीही केलेले नाही, माझ्याविरोधात कट रचण्यात आला आहे असा कांगावा कर्जबुडव्या विजय मल्ल्याने पुन्हा एकदा केला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत असेही विजय मल्ल्याने म्हटले आहे. लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टात विजय मल्ल्या आला होता त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्याने हा कांगावा केला आहे. भारतातील विविध बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज  बुडवून विजय मल्ल्या लंडनमध्ये पळाला आहे.

भारतातून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. याआधी २० नोव्हेंबर रोजी भारतात माझ्या जीवाला धोका आहे असे विजय मल्ल्याने सांगितले होते. त्याच्या वकिलांनी त्याच्या बाजूने तसा अर्ज लंडनच्या कोर्टात केला होता. त्याला भारतात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. अशात माझ्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप निराधार असल्याचा कांगावा त्याने याआधीही केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

विजय मल्ल्याने भारतातील तुरुंगाची अवस्था वाईट असल्याचेही कारण दिले होते. दरवेळी विजय मल्ल्या वेस्टमिनिस्टर कोर्टात आला की काही ना काही कारणे देताना दिसतो. विजय मल्ल्या भारतातून लंडनमध्ये पळाल्याने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. सध्याच्या घडीलाही विजय मल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात येते आहे. विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र त्याचा कांगावा काही संपताना दिसत नाही. मी कोर्टाने सांगितलेली प्रक्रिया पार पाडतो आहे मात्र माझा कर्जाच्या प्रकरणाशी संबंध नाही असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.