कोलकाता : आयएएस नियमावली १९५४ मधील प्रस्तावित दुरुस्तीविरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या दुरुस्ती जाचक असून त्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होईल आणि त्यांच्या कामगिरीवर परिणाम होईल, असे ममता यांनी म्हटले आहे. या दुरुस्तीमुळे संघराज्याची संरचना आणि संविधानाची मूलभूत रचना ‘नष्ट’ होईल, असे गेल्या आठ दिवसांत या मुद्द्यावर मोदी यांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ममता यांनी नमूद केले आहे.