IAS Rinku Singh Rahi Resigns from UP Cadre over Systemic Issues : कामावर रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी आंदोलन करणाऱ्या वकिलांच्या समोप उठबशा काढल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलेच चर्चेत आलेले आएअस रिंकु सिंग राही यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

उत्तर प्रदेश केडरचे २०२२ च्या बॅचचे हे आयएएस (IAS) अधिकारी असलेल्या राही यांनी आपल्याला बाजूला सारण्यात आले तसेच सक्रियपणे काम करण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही, असा आरोप करत राजीनामा दिला आहे. राही हे दीर्घकाळापासून महसूल परिषदेशी सलग्न होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राही यांनी आपल्या राजीनामा पत्रात त्यांना महत्त्व असलेले काम देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच आणि घटनात्मक चौकटीच्या बरोबरीने एक ‘समांतर व्यवस्था’ काम करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

पगार मिशत असला तरी आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळत नव्हती असेही राही म्हणाले. तसेच आपल्या निर्णय हा नैतिकतेच्या आधारावर घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जुलै २०२५ मध्ये शहाजहानपूर जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणून रुजू झाल्याच्या पहिल्याच राही हे चांगलेच चर्चेत आले होते. एका घटनेवरून वकिलांसमोर कान पकडून उठाबशा काढतानाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला होता.

संबंधित घटना एका तहसील इन्स्पेक्शनदरम्यान घडली होती. तहसील परिसराच्या तपासणीदरम्यान, त्यांना चार जण सार्वजनिक ठिकाणी लघवी करताना आढळले आणि त्यांनी शिक्षा म्हणून त्यांना जागेवरच उठाबशा काढायला सांगितल्या. त्या व्यक्तींपैकी एक जण एका वकिलाकडे कारकून म्हणून काम करत होता. यामुळे या शिक्षेविरोधात स्थानिक वकिलांनी आंदोलन सुरू केले. तणाव कमी करण्याचा प्रयत्नात, राही यांनी आंदोलन करणाऱ्या वकिलांशी संवाद साधला, त्यांची माफी मागितली आणि जाहीरपणे स्वत:ला देखील तीच शिक्षा करून घेतली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे राज्य सरकारकडून राही यांची बदली महसूल परिषदेमध्ये करण्यात आले.

राही यांची कारकीर्द अशाच वादग्रस्त आणि धाडसी घटनांनी भरलेली राहिली आहे. २००९ मध्ये, मुझफ्फरनगर येथे समाजकल्याण अधिकारी म्हणून काम करत असताना, त्यांनी ८३ कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या हल्ल्यातून ते बचावले, पण त्यांच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली.

असे असूनही त्यांनी प्रशासनात काम करणे सुरूच ठेवले, ज्यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी आणि मान सन्मान मिळाला.

आयएएस होण्यापूर्वी, राही यांनी राज्य नागरी सेवेत काम करत होते आणि सेवेत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.