“नवज्योतसिंग सिद्धू यांनी जर मौन पाळलं तर काँग्रेस आणि देशाला खूप शांतता मिळेल”, असा खोचक टोला हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी शनिवारी (९ ऑक्टोबर) लगावला आहे. “नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं आहे. जर त्यांनी हे मौन व्रत कायमचं पाळलं तर काँग्रेसलाही खूप शांतता मिळेल आणि देशालाही”, असं विधान अनिल विज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केलं आहे. लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपोषण करण्याचा निर्धार केल्यानंतर अनिल विज यांनी ही टीका केली होती. मात्र, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उत्तर प्रदेश पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर सिद्धू यांनी शनिवारी उपोषण संपवलं.

“काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे”, अशी देखील टीका अनिल विज यांनी केली आहे. “काँग्रेसमध्ये कलह आहे. जेव्हा एखादं जहाज बुडायला लागतं तेव्हा ते डगमगू लागतं. त्याचप्रमाणे, काँग्रेस देखील पुन्हा पुन्हा डगमगत आहे. याचवरून स्पष्ट होत आहे की, काँग्रेसचं जहाज बुडणार आहे,” असं अनिल विज म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना विज म्हणाले की, “उत्तर प्रदेश सरकार योग्य कारवाई करत आहे.” दरम्यान, या हिंसाचारात ८ जणांसह ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी लखीमपूर खेरीला पोहोचताच शुक्रवारी (८ ऑक्टोबर) रात्रीपासून ‘मौन’ ठेवलं होतं. आशिष मिश्रा शनिवारी पोलिसांकडे चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांनी मौन आंदोलन मागे घेतलं.

११ तासांच्या चौकशीनंतर आशीष मिश्राला अटक

लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राने निर्दोष आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या वाहनाने अत्यंत क्रूर पद्धतीने चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष ऊर्फ मोनूला शनिवारी (९ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता युपी पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर करण्यात आलं आणि ११ तासांच्या चौकशीनंतर आशीष मिश्राला आता म्हणजेच या प्रकरणानंतर आणि प्रचंड मोठ्या दबावानंतर अखेर आठवड्याभराने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

हरियाणाचे शेतकरी हुशार!

हरियाणातील शेतकऱ्यांचं कौतुक करताना अनिल विज यावेळी म्हणाले की, “राज्यातील शेतकरी खूप हुशार आहेत. हरियाणाच्या शेतकऱ्यांना व्यवस्थित ठाऊक आहे की पिकांचे अवशेष जाळल्याने पर्यावरणाचं नुकसान होतं आणि जमिनीची सुपीकता देखील कमी होते. त्यामुळे हरियाणातील शेतकरी या बाबतीत नेहमी सावध असतात आणि शेतकऱ्यांना सरकारकडून वेळोवेळी याबाबत माहितीही दिली जाते”.