पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शहबाझ शरीफ यांनी काश्मीरबाबतचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले असून, पाकिस्तान त्यांना ‘राजनैतिक व नैतिक पाठिंबा’ देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करेल, असे ते म्हणाले. मात्र दुसरीकडे हे या भाषणानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरुन शहबाझ शरीफ यांना ट्विटरवरुन शुभेच्छा देताना दहशतवादमुक्त प्रांत ठेवण्यासाठी दोन्ही देश काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केलीय.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहबाझ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तत्पुर्वीच त्यांनी आपल्याला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, मात्र काश्मीर मुद्दा सुटल्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही, असे सांगितले होते. राजकीय उलथापालथीनंतर इम्रान खान यांना हटवून पंतप्रधानपदी आलेले ७० वर्षांचे शहबाझ यांनी पंतप्रधान होण्याच्या काही तास आधीच काश्मीरबद्दल वक्तव्य केलं होतं. दरम्यान ते पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

“पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचं अभिनंदन. भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असं झाल्यास आपण विकास कामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करु शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचं भलं करण्याबरोबरच संपन्नता प्रदान करता येईल,” असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय.

दरम्यान, शाहबाज यांनीही काश्मीर मुद्दयांची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे यावे, जेणेकरून दोन्ही देश सीमेच्या दोन्ही बाजूंला असलेल्या गरिबी, बेरोजगारी, औषधटंचाई व इतर मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करू शकतील, असेही मत नोंदवले.

आपले शेजारी आपल्याला निवडता येत नाहीत, आपल्याला त्यांच्यासोबत राहावेच लागते आणि पाकिस्तानच्या निर्मितीपासून आमचे भारतासोबते संबंध दुर्दैवाने कधीही चांगले राहिलेले नाहीत, असे शहबाझ म्हणाले. ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने अनुच्छेद ३७० रद्द केला तेव्हा इम्रान खान यांनी ‘गंभीर व राजनैतिक प्रयत्न केले नाहीत’, असा आरोप शहबाझ यांनी केला. ‘काश्मिरी लोकांचे रक्त काश्मीरच्या रस्त्यांवर वाहात असून, त्यांच्या रक्ताने काश्मीर खोरे लाल झाले आहे’, असे देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांचे लहान भाऊ असलेले शहबाझ म्हणाले.