जम्मूमधील भारतीय सैन्याच्या चौक्या आणि सीमारेषेवरील गावांवर शुक्रवारी पाकिस्तानी रेंजर्सनी तुफान गोळीबार आणि तोफगोळयांचा वर्षाव केला. यामध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला असून एक बीएसएफ जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येत आहेत. आरएस पूरा, बिशनाह आणि अर्णिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मॉर्टर हल्ला आणि गोळीबार करण्यात आला असे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जम्मू-काश्मीरच्या आर. एस. पुरा सेक्टर या भागात शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी रेंजर्सकडून अचानक गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, कारवाईदरम्यान एका बीएसएफ जवानाला सर्वोच्च बलिदान द्यावे लागले. त्याचबरोबर दोन नागरिक यात जखमी झाले असून आंतरराष्ट्रीय सीमेच्या ३ किमीच्या त्रिज्येच्या परिसरातील शाळांना स्थानिक प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कालही पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना कालच घडली होती. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तुफान गोळीबार केला होता. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता. दरम्यान, मंगळवारीही सांबामध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक कॉन्स्टेबल शहीद झाला होता.