गेल्यावर्षी भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणची परिस्थिती पुन्हा चिघळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आहे. यासाठी आज रात्री १० वाजल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. समाज विघातक शक्तींनी इंटरनेट सुविधेचा गैरफायदा घेऊ नये. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती 'एएनआय'ने दिली. पुढील सूचना येईपर्यंत ही बंदी कायम असेल. सरकारकडून यापूर्वीच अमरनाथ यात्रा आणि बुरहान वानीच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे २१ हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. आम्ही काश्मीरमध्ये कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सर्वतोपरी तयार आहोत. त्यासाठी आम्ही केंद्रीय दलाच्या २१४ तुकड्या काश्मीरमध्ये पाठवल्या आहेत, अशी माहिती गृहसचिव राजीव मेहऋषी यांनी दिली. भारतीय लष्कर करणार ‘या’ १२ दहशतवाद्यांचा खात्मा कालच भारताच्या विरोधानंतर बर्मिंगहॅमध्ये दहशतवादी ‘बुरहान वानी दिना’चा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. बर्मिंगहॅममध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला श्रद्धांजली म्हणून एका संघटनेने रॅलीचे आयोजन केले होते. ८ जुलै रोजी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीचा गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील चकमकीत खात्मा झाला होता. बुरहान वानीच्या मृत्यूला वर्ष पूर्ण होत असताना ब्रिटनमधील बर्मिंगहॅममध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘काश्मीर रॅली’ असे नाव या रॅलीला देण्यात आले होते. यामध्ये बुरहान वानीचे छायाचित्र असलेले पोस्टर्स आणि त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजीदेखील करण्यात येणार होती. या रॅलीचा भारताने निषेध दर्शवला होता. भारताच्या विरोधानंतर ब्रिटनने या रॅलीला दिलेली परवानगी रद्द केली. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाय के सिन्हा यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यान ब्रिटनला इशारा दिला होता. भारताच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष झाल्यास ब्रिटनसोबत आर्थिक संबंध सुधारण्यात अडचणी येतील असा इशारा त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर ब्रिटनने या रॅलीच्या आयोजनाला दिलेली परवानगीच रद्द केली आहे. ब्रिटनमध्ये यापूर्वीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्यानावाखाली भारतविरोधी रॅलींना परवानगी देण्यात आली होती. गेल्यावर्षी अनंतनाग जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी ठार झाला होता. २०१० मध्ये वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी बुरहान दहशतवादी ताफ्यात सामील झाला होता. बुरहानवर लष्कराने दहा लाखांचे बक्षीस जारी केले होते. आपले जाळे वाढविण्यासाठी बुरहानने सोशल साईट्सवरही सक्रीय होता.