२०१९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरुन टिप्पणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विजय माल्या, नीरव मोदी व ललित मोदी अशा कर्जबुडव्या उद्योगपतींचा उल्लेख करत ‘सर्व चोर मोदीच का असतात’ असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. कर्नाटक निवडणुकीच्या रॅलीत मोदी आडनावाबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर गुजरातमधील भाजपाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
याप्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुरत न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.




तत्पूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या ७ जुलैच्या या आदेशाला राहुल गांधी यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यांनी वकील प्रसन्न एस यांच्यामार्फत हे अपील सादर केलं आहे.
या मानहानी प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर २४ मार्च २०२३ रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी याचिका गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात केली. मात्र, ‘राजकारणातील पावित्र्य’ ही काळाची गरज आहे, असे सांगून उच्च न्यायालयाने ७ जुलैला त्यांची याचिका फेटाळून लावली. या आदेशाला राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.