नवी दिल्ली : युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशातील महत्त्वाच्या शहरांची व आस्थापनांची संरक्षणसिद्धता तपासण्यासाठी आज, बुधवारी देशभरात स्वसंरक्षण सराव केला जाणार आहे. शत्रूकडून हवाई हल्ले केले गेले तर नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे व त्यासाठी सर्व राज्यांतील प्रशासन सज्ज असले पाहिजे, अशी सूचना मंगळवारी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आली. या बैठकीमध्ये २५ राज्यांचे मुख्य सचिव, नागरी सुरक्षा प्रमुख व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
१९७१ नंतर पहिल्यांदाच देशात स्वसंरक्षण सराव केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केलेले नागरी सुरक्षा जिल्हे हे महसूल खात्याच्या प्रशासकीय जिल्ह्यांपेक्षा वेगळे आहेत. मंत्रालयाने ३५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना २५९ नागरी सुरक्षा जिल्ह्यांमध्ये विभाजित केले असून तीन श्रेणींमध्ये त्यातील शहरे वा ठिकाणांचा समावेश केला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई यासारखी अतिमहत्त्वाच्या शहरांचा यात समावेश असून काही ठिकाणे सीमेलगत वा आसपास असून काही ठिकाणे ईशान्येकडील राज्यांत आहेत. राज्यस्थानमध्ये सर्वाधिक २८ शहरे व ठिकाणे, पंजाबमध्ये २०, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये प्रत्येकी १९, हरियाणामध्ये ११, झारखंडमध्ये सहा, मध्य प्रदेश व बिहारमध्ये प्रत्येकी पाच, छत्तीसगढ व हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एक, चंदीगढ व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश यांचा यात समावेश आहे. या यादीमध्ये देशातील सर्व राजधानीची शहरे व महत्त्वाची संवेदनशील सरकारी आस्थापने व प्रकल्प, संरक्षणविषयक ठिकाण असलेल्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
स्वसंरक्षण सराव कशासाठी?
हवाई हल्ले झाल्याचा इशारा देणारा बोंगा वाजल्यानंतर नागरिकांची सतर्कता तपासणे, नागरिकांना, विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीमध्ये स्वच:चा बचाव कसा केला पाहिजे हे शिकवणे, आपतकालीन परिस्थितीमधील व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची तयारी, सर्वत्र अंधारात कसे वागावे आदींचा सराव केला जाईल.
नागरिकांसाठी सूचना
युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. घरामध्ये प्रथमोपचारासाठी आवश्यक साधने, औषधे, मेणबत्ती, टॉर्च आदी सामान ठेवण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
भाजपच्या खासदारआमदारांनाही सूचना
देशभर होणाऱ्या स्वसंरक्षण सरावामध्ये भाजपच्या खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधींनी सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. संघाचे कार्यकर्तेही या सरावामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते.