Indian Air Defence System: ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप चालू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. त्यामुळे बुधवारी पहाटे जरी भारतानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवादाचं कंबरडं मोडलं असलं, तरी या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कर पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. त्याचाच प्रत्यय बुधवारी रात्री सीमेवर आला. पाकिस्तानकडून बुधवारी रात्री हवाई हल्ला करण्यात आला होता. मात्र, भारतीय हवाई दलानं ‘एस-४०० सुदर्शन चक्र’ बुधवारी रात्री डागलं असून पाकिस्तानची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केली आहेत.
पाकिस्ताननं भारतात उत्तर आणि पश्चिम भागात एकूण १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे व ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. हे सर्व हल्ले भारतीय सुरक्षा यंत्रणेनं परतवून लावले आहेत. पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष या भागात पडले असून ते गोळा करण्याचं काम चालू आहे. या अवशेषांवरून ते पाकिस्ताननंच डागल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारतातील १५ ठिकाणांवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न
“७ आणि ८ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. त्यात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कापुरथला, जलंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या १५ शहरांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हे हल्ले करण्यात आले. इंटीग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. हे पाकिस्तानचेच हल्ले असल्याचं या ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या अवशेषांवरून स्पष्ट होत आहे”, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
भारताचं सडेतोड प्रत्युत्तर
दरम्यान, भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं. भारतीय हवाई दलानं बुधवारी रात्री सीमेवर ‘एस ४०० सुदर्शन चक्र एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम’ डागली. एएनआयनं यासंदर्भात वृत्त दिलं असून याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत दुजोरा अपेक्षित असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. भारताच्या ‘सुदर्शन’नं पाकिस्तानकडून डागलेले सर्व क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केले.
काय आहे S 400 Sudarshan ?
भारताची एस ४०० सुदर्शन ही एअर डिफेन्स मिसाईल यंत्रणा जगातली सर्वात अत्याधुनिक लांब पल्ल्याची एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम मानली जाते. भारतानं रशियाशी एकूण ५ एस ४०० चा करार केला आहे. त्यातील तीन भारतीय ताफ्यात आधीच दाखल झाली असून उर्वरीत दोन २०२६ पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये यासाठी भारतानं रशियाशी ३५ हजार कोटींचा करार केला होता. एका एस-४०० स्क्वाड्रनमध्ये एकूण १२ लाँचर्स, अत्याधुनिक रडार आणि कंट्रोल युनिट असतं. मोठ्या संख्येनं मिसाईल्स एकाच वेळी डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये असते.
S-400 Sudarshan शत्रूराष्ट्राकडून येणारी विमानं, फायटर जेट्स, ड्रोन, क्रूज आणि बॅलेस्टिक मिसाईल्स यांचा ४०० किलोमीटरच्या अंतरावरूनही माग काढून त्यांचा वेध घेऊ शकतं.