India Pakistan War Tensions: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या १५ दिवसांत या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर अर्थात ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं.
मध्यरात्रीनंतर पाकिस्तानच्या हद्दीत स्फोटांचे आवाज!
मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचं, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचं आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचं मोठं नुकसान भारतानं केल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोणत्या ९ ठिकाणांना केलं लक्ष्य?
दरम्यान, भारतानं कोणत्या ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, याची यादी समोर आली आहे.
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद
अशी ती ९ ठिकाणं आहेत. या ठिकाणी जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीन दहशतवादी संघटनांचे तळ होते. या ठिकाणी मोठ्या संख्येनं दहशतवादी असल्याची माहिती भारतीय लष्कराकडे होती. त्यानुसार सुनियोजित पद्धतीने फक्त याच ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. तसेच, पाकिस्तानी लष्कराच्या तळावरदेखील हल्ला केलेला नाही.
पाकिस्तानला लक्ष्य करताना भारतानं याआधीही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केले आहेत. पण १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी संयुक्तपणे पाकिस्तानविरोधातल्या कारवाईत सहभाग घेतल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकी वेळ…१ वाजून २८ मिनिटं!
भारतीय हवाई दलानं मध्यरात्रीनंतर म्हणजेच १ वाजून २८ मिनिटांनी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. पुढच्या २३ मिनिटांत सर्व ९ दहशतवादी तळ भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केले होते. या कारवाईसाठी भारताकडून राफेल विमानांचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय, भेदक मारा करणाऱ्या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर ऑपरेशन सिंदूरसाठी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कारवाईदरम्यान होतं लक्ष
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण करावाईवर लक्ष ठेवून होते. मंगळवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. मात्र, कोणत्याही प्रकारे अशा कोणत्या हल्ल्याची तयारी भारत करतोय, हे उघड न होऊ देता भारतानं हा एअर स्ट्राईक केला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इतर देशांशी संपर्क
एअर स्ट्राईक झाल्यानंतर पुढच्या काही वेळातच भारत सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी इतर देशांमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी या एअर स्ट्राईकसंदर्भात संपर्क साधला. त्यांना हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. यात अमेरिकेचे मार्को रुबियो, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ब्रिटन अशा देशांचा समावेश आहे.
देशभरातून अभिनंदनपर प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे असल्याचं नमूद केलं होतं. या एअर स्ट्राईकनंतर विरोधी पक्षांतील सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे. तसेच, भारतीय लष्कराचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
पीडितांच्या कुटुंबीयांच्या भावनिक प्रतिक्रिया
पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांनी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्याला न्याय मिळाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील मृत नागरिकांच्या कुटुंबीयांनीदेखील ऑपरेशन सिंदूरबाबत समाधान व्यक्त केलं आहे.
ऑपरेशन सिंदूर नाव का?
दरम्यान, या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असंच नाव का दिलं? अशी चर्चा सुरू असताना पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्यात घरातल्या कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत महिलांचं कुंकू पुसलं होतं. त्यामुळेच या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं म्हटलं गेलं.
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या एअर स्ट्राईकसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता मोठं काहीतरी घडणार असं वाटतच होतं. भारत व पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालूच होता. मी आशा करतो, की आता हे सगळं लवकर संपेल”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.