आठवडाभरापूर्वी उडालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये आता चर्चा होत आहे. भारतीय लष्करानंच यासंबंधी माहिती दिल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. विशेष म्हणजे ही चर्चा सीमापार चीनच्या भूमीत होत आहे.

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. मागच्या सोमवारी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर चीनची मुजोरी समोर आली होती. या संघर्षात चीनचीही मोठी जिवीतहानी झाली होती. तसेच भारतातही चीनविरोधी लाट उसळली होती. आता दोन्ही देशांमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे.

भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. त्यात म्हटलंय की, “भारत आणि चीनमध्ये आता कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे. ही बैठक प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलिकडे चीनच्या भूमीत मोल्डो येथे होत आहे. त्यात लडाखमधील संघर्षाबद्दल चर्चा केली जाणार आहे.”