जाणूनबुजून फेक न्यूज पसरवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समाजमाध्यमांतून सातत्याने पसरविल्या जात असलेल्या फेक न्यूजचा (जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविणे म्हणजे ‘फेक न्यूज’!) प्रसार आणि अन्य बदनामीकारक मोहिमांसाठी सोशल मीडियाचा वापर झाला, तर त्यांच्या भारतातील प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी शिफारस उच्च सरकारी समितीने केली आहे.

सोशल मीडियावरुन पसरवल्या जाणाऱ्या खोटया माहितीमुळे जमावाकडून ठेचून हत्या होण्याच्या तसेच दंगलीच्या घटना भारतात घडल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांनी आपला अहवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवला आहे. राजनाथ सिंह मंत्रिगटाचे प्रमुख आहेत.

भारतातील अनेक राज्यात अलीकडे सोशल मीडियावरुन पसरलेल्या फेक न्यूजमुळे जमावाने केलेल्या मारहाणीत निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावरुन अफवा पसरुन सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत असे सदस्यांचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्याच्या घडीला या फक्त शिफारशी आहेत. याबद्दल मंत्रिगटाच्या बैठकीत भूमिका ठरवण्यात येईल. त्यानंतर तो अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवला जाईल. याचा सर्वस्वी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.