India Pakistan Ceasefire News Update: गेल्या चार दिवसांपासून भारत व पाकिस्तान यांच्यात चालू असलेली सीमेवरील धुमश्चक्री आता शांत झाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामासंदर्भात सहमती झाली असून आज शनिवार १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही शस्त्रसंधी दोन्ही बाजूंनी लागू केली आहे. त्यामुळे सीमेवर दोन्ही बाजूंनी केली जाणारी कारवाई स्थगित झाली आहे. यासंदर्भात आता सोमवारी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता भारत व पाकिस्तानचे DGMO अर्थात लष्करी कारवायांसदर्भातले महासंचालक पुढील चर्चा करणार आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, एकीकडे शस्त्रविराम झाला असला, तरी भारतानं पाकिस्तानच्या स्वभावाचा अंदाज घेऊन पत्रकार परिषदेतच सज्जड इशारा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने शस्त्रविरामानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्ताननं पुन्हा काही आगळीक केली तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचं स्पष्ट केलं.

“आम्ही शस्त्रविरामाचं पालन करू, पण…”

या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासोबत कमांडर रवी नायरदेखील उपस्थित होते. त्यांनी यावेळी भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही आज झालेल्या शस्त्रविरामाचं पालन करू. पण आम्ही पूर्णपणे सज्ज राहू. कायम सतर्क असू. भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आत्तापर्यंत पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारच्या आततायी कारवाईवर पूर्ण ताकदीनं भारतानं उत्तर दिलं आहे. यापुढेही जर असं काही पाऊल पाकिस्ताननं उचललं तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. भारताच्या सुरक्षेसाठी यापुढेही जी काही मोहीम हाती घ्यावी लागेल, त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असू”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर शस्त्रविराम?

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामावर सहमती झाल्याची पोस्ट त्यांच्या एक्स अकाऊंटवर केली. “रात्रभर अमेरिकेच्या मध्यस्थीने सविस्तर चर्चा केल्यानंतर भारत व पाकिस्तानने पूर्णपणे व तातडीने शस्त्रविराम करण्यावर सहमती दर्शवल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. यासाठी मी दोन्ही बाजूंचं अभिनंदन करतो”, असं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटंल आहे.

पाकिस्तानचे खोटे दावे कले उघड

दरम्यान, या पत्रकार परिषदेत भारतीय लष्करानं पाकिस्ताननं केलेल्या खोट्या दाव्यांचा बुरखा फाडला. भारताची एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम, ब्रह्मोस मिसाईल व्यवस्था, भारतीय हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे पाकिस्ताननं केले होते. हे सर्व दावे खोटे असल्याचं भारतीय लष्करानं पत्रकार परिषदेत सांगितलं असून त्यासाठी पुराव्यादाखल फोटोही सादर केले.