पीटीआय, लंडन
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावावर ब्रिटिश संसदेत प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचे आवाहन सर्व पक्षांच्या सदस्यांनी केले. ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाचे मंत्री हमिश फाल्कनर यांनी बुधवारी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये चर्चेला सुरुवात केली. ‘‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा. उभय देशांनी राजनैतिक मार्ग शोधण्यासाठी संवाद साधला पाहिजे. ब्रिटनचे दोन्ही देशांशी जवळचे आणि अद्वितीय संबंध आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध आहे. नागरिकांचे जीव जात असल्याचे पाहून मन हेलावून जाते, असे फाल्कनर म्हणाले.
संयम बाळगण्याचे आवाहन
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील राष्ट्रांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन्ही देशांतील वाढत्या शत्रुत्वाबद्दल चिंता व्यक्त केली आणि या शेजारी राष्ट्रांनी तणाव कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे (यूएनजीए) अध्यक्ष फिलेमोन यांग यांनी शाश्वत शांततेसाठी भारत आणि पाकिस्तान या देशांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
इस्रायली नागरिकांना काश्मीर सोडण्याचे आवाहन
जेरुसलेम : भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान इस्रायलने जम्मू-काश्मीरमधील इस्रायली नागरिकांना तात्काळ हा प्रदेश सोडण्याचे आवाहन केले. लडाख वगळता जम्मू आणि काश्मीर प्रदेशात जाणे टाळावे आणि स्थानिक सुरक्षा दलांच्या सूचनांचे पालन करावे, असे इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
‘जशास तसे’ कारवाया थांबल्या पाहिजेत ट्रम्प
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानने ‘जशास तसे’ कारवाया थांबवाव्यात. दोन्ही देशांना मध्यस्थीसाठी माझी गरज भासली तर त्यासाठी ते उपलब्ध असतील, असे ट्रम्प यांनी सांगितले. भारत-पाकिस्तानातील वाढत्या तणावाबाबत हे खूप भयानक असल्याचे ट्रम्प म्हणाले. ‘‘मी दोन्ही देशांशी सहमत आहे. दोन्ही देशांशी माझे चांगले संबंध आहेत. मला त्यांना या परिस्थितीतून मार्ग काढताना पाहायचे आहे. त्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मला आशा आहे की आता त्यांच्यातील तणाव थांबेल,’’ असे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकी वाणिज्य दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना निर्देश
लाहोर : ड्रोन स्फोट आणि हल्ल्यांच्या वृत्तांमुळे लाहोरमधील अमेरिकी वाणिज्य दूतावासाने गुरुवारी सर्व वाणिज्य दूतावास कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले. लाहोरच्या मुख्य विमानतळाजवळील काही भाग रिकामे करत असल्याचे प्राथमिक अहवाल मिळाले आहेत. अमेरिकी नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्षाचे क्षेत्र सोडण्यास सांगितले आहे. तेथून निघून जाणे शक्य नसेल तर त्यांनी सुरक्षित ठिकाणीच आश्रय घ्यावा, असे वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे.
सौदी अरेबियाचे मध्यस्थीचे प्रयत्न
नवी दिल्ली : सौदी अरेबियाच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री अदेल अल्जुबेर गुरुवारी अघोषित भारत दौऱ्यावर आले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानातील तणाव कमी करण्यासाठी सौदी अरेबिया मध्यस्थाची भूमिका घेत असल्याचे दिसून येत असून परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेत यावरच भर देण्यात आला. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अल्जुबेर यांच्याशी विस्तृत चर्चा झाली आहे.