Ajit Doval On China : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याने भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर अखेर आज (१० मे) भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामाच्या कराराची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणि त्यानंतर आज झालेल्या शस्त्रविरामानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा केली. यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना युद्ध हा भारताचा पर्याय नाही, असं अजित डोवाल यांनी म्हटलं. तसेच दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
अजित डोवाल यांनी काय चर्चा केली?
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “अजित डोवाल यांनी संवाद साधताना म्हटलं की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक भारतीय पर्यटकांचे प्राण गेले. त्यामुळे भारताने दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज आहे. युद्ध हा भारताचा पर्याय नाही आणि तो पर्याय कोणत्याही पक्षाच्या हिताचा नाही. भारत शस्त्रविरामासाठी वचनबद्ध आहे आणि शक्य तितक्या लवकर प्रादेशिक शांतता पुनर्संचयित करण्याची आशा आहे”, असं अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करताना म्हटल्याचं सांगण्यात येत आहे.
Chinese Foreign Minister Wang Yi had a phone conversation with Indian National Security Advisor Doval
— ANI (@ANI) May 10, 2025
As per Chinese Foreign Ministry, "Doval said that the Pahalgam terrorist attack caused serious casualties among Indian personnel and that India needed to take counter-terrorism… pic.twitter.com/38ZyFkHrTN
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय म्हटलं?
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अजित डोभाल यांच्याशी चर्चा करताना म्हटलं की, “भारत आणि पाकिस्तानला व्यापक आणि कायमस्वरूपी शस्त्रविरामासाठी चीन समर्थन करतो. तसेच हेच भारत आणि पाकिस्तानच्या हिताचं आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा चीन निषेध करत असून आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती परस्परांशी जोडलेली आहे. आशियाई प्रदेशात शांतता आणि स्थैर्य साध्य करणं जपलं पाहिजे”, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटलं.
“भारत आणि पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र आहेत आणि दोघेही चीनचे शेजारी आहेत. युद्ध ही भारताची निवड नाही, या तुमच्या विधानाचं आम्ही कौतुक करतो. भारत आणि पाकिस्तान शांतता आणि संयम राखतील अशी प्रामाणिक आशा करतो. संवाद आणि सल्ला मसलतीद्वारे मतभेद योग्यरित्या हाताळले जाऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान चर्चांद्वारे कायमस्वरूपी वाद मिटवतील अशी आशा आम्ही करत आहोत. भारत आणि पाकिस्तानच्या हिताचं आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचीही हीच इच्छा आहे”, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे.