India Pakistan Tension : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. तसेच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत ‘एअर स्ट्राईक’ करत पाकिस्तानमधील ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दिलं. मात्र, यानंतर अद्यापही पाकिस्तानची आगळीक सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानकडून गुरुवारी मध्यरात्री भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्यात आले. या ड्रोन हल्ल्याला भारताच्या सैन्याने जशास तसं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्राचे काही अवशेष पंजाबच्या होशियारपूरमध्ये आढळून आले आहेत. होशियारपूरमधील एका शेतामध्ये पाकिस्तानने डागलेले क्षेपणास्त्र आढळल्याची माहिती समोर आली आहे. या क्षेपणास्त्राची काही दृश्ये समोर आले असून सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, होशियारपूरमधील एका डोंगराळ भागात एक क्षेपणास्त्र आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षेपणास्त्राचे अवशेष आढळून आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. तसेच क्षेपणास्त्राचे अवशेष भारताच्या हद्दीत नेमकं कसं आलं? याचा तपास पोलीस करत आहेत. हे क्षेपणास्त्र चीन बनावटीचं असून पीएल-१५ लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, पीएल-१५ लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. भारताच्या हवाई दलाने हे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिकांना स्फोटांचे आवाज ऐकू आले होते असं सांगण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात याबाबत म्हटलं की, भारतातील अनेक ठिकाणी लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने वापरलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रे निष्क्रिय करण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राचे अवशेष काही ठिकाणी सापडत आहेत, जे पाकिस्तानी असल्याचे पुरावे समोर आले आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे.