India Pakistan Tension : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर पाकिस्तानची चलबिचल वाढल्याने पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात येत होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यानंतर अखेर आज (१० मे) संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत एकमत झालं.

पण शस्त्रविरामानंतर काही तासांतच श्रीनगरमध्ये ड्रोन दिसल्याचा एक व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शेअर केला होता. त्यामुळे पाकिस्तानची आगळीक पुन्हा समोर आली होती. श्रीनगर आणि उधमपूरमध्ये स्फोटांचे वृत्त समोर आल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचंही बोललं जात होतं. राजस्थानच्या काही भागातही ड्रोन दिसल्याचं इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर (ट्विट) एक पोस्ट शेअर केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यांनी म्हटलं की, “युद्धबंदीचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले”, असा दावा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

पंजाबमधील काही भागातही ब्लॅकआउट

भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या फिरोजपूर, बर्नाला, पठाणकोट आणि इतर सीमावर्ती भागात शनिवारी संध्याकाळी ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. तसेच फिरोजपूरमध्ये ८:४० वाजता ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. जिल्हा प्रशासनाने सावधगिरीचा उपाय असल्याचं सांगितलं आणि नागरिकांना सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. तसेच घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितलं.”