India Operation Sindoor Updates: जम्मूमधील अनेक शहरांना लक्ष्य करून गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना भारताने रोखण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. या दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयाने उत्तर भारतातील किमान २४ विमानतळांवर पुढील सूचना येईपर्यंत नागरी उड्डाणे स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत खबरदारीच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे सशस्त्र दलांनी गेल्या महिन्यात २६ जणांचा बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते.
जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची मालिका
पाकिस्तानने जम्मू, तसेच पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू केल्यानंतर ही सूचना जारी करण्यात आली. बुधवारी उशिरा संध्याकाळपासून जम्मूमध्ये संपूर्ण काळोख होता, नागरिकांनी आकाशात क्षेपणास्त्रांच्या रेषा पाहिल्याचे वृत्त आहे.
माता वैष्णवी देवी आणि भारतीय सशस्त्र दल आपल्यासोबत
“जम्मूमध्ये पूर्ण काळोख असून, मोठ्याने स्फोट, बॉम्बस्फोट, गोळीबार किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याचा संशय आहे. घाबरू नका, माता वैष्णवी देवी आणि भारतीय सशस्त्र दलही आपल्यासोबत आहेत,” असे जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेष पॉल वैद म्हणाले.
ही २४ विमानतळे राहणार बंद
नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, अमृतसर, लुधियाना, भुंटर, किशनगड, पटियाला, शिमला, कांगडा-गग्गल, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, हलवारा, पठाणकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, हिरासर (राजकोट), पोरबंदर, केशोड, कांडला आणि भुज ही विमानतळे पुढील सूचना मिळेपर्यंत नागरी प्रवासासाठी बंद राहणार आहेत.
सेकंडरी लॅडर पॉइंट चेकिंग अनिवार्य
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने विमानतळांच्या टर्मिनल इमारतीत भेट देणाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आणि वाढीव सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून सर्व उड्डाणांसाठी सुरक्षा तपासणी आणखी कठोर केली आहे.
सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा एक भाग म्हणून, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने सर्व विमानतळांवरील सर्व उड्डाणांसाठी सेकंडरी लॅडर पॉइंट चेकिंग अनिवार्य केले आहे. साधारणपणे, याचा अर्थ विमानात चढण्यापूर्वी प्रवाशांची आणि त्यांच्या हातातील सामानाची तपासणी करणे असा होतो.