भारतातील करोना संसर्ग दिवसेंदिवस बऱ्याच अंशी नियंत्रणात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये २० हजार ७९९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारच्या (३ ऑक्टोबर) तुलनेत हा आकडा ८.९ टक्क्यांनी कमी आहे. तर याच एका दिवसात करोनामुळे १८० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब अशी की, २६ हजार ७१८ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, देशाचा रिकव्हरी रेट ९७.८९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, सद्यस्थितीत देशात करोनाच्या २ लाख ६४ हजार ४५८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत ३ कोटी ३१ लाख २१ हजर २४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे, करोनामुळे देशभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४८ हजार ९९७ जणांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर, देशात आतापर्यंत एकूण तब्बल ९० कोटी ७९ लाख ३२ हजार ८६१ नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

केरळ, महाराष्ट्रासह या ५ राज्यांतील रुग्णसंख्या जास्त

करोनाच्या सर्वाधिक नोंद होणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांच्या समावेश आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये १२ हजार २९७, त्यानंतर महाराष्ट्रात २ हजार ६९२, तमिळनाडूत १ हजार ५३१, आंध्र प्रदेशमध्ये ७६५ आणि पश्चिम बंगालमध्ये ७०१ इतक्या नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील एकूण प्रकारणांपैकी सुमारे ८६.४७ टक्के नवीन करोना प्रकरणं ही याच पाच राज्यांमध्ये नोंदवली गेली आहे. तर नवीन प्रकरणांपैकी ५९.१२ टक्के प्रकरणं एकट्या केरळमधली आहेत. त्यामुळे, केरळ राज्याची चिंता चांगलीच वाढली आहे. करोना मृत्यूंचा विचार करता, केरळमध्ये गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजेच ७४ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात करोनामुळे ४१ मृत्यूंची नोंद झाली आहे