भारताकडून श्रीलंकेला मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. भारताने श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात पट्रोल पाठवले आहे. आर्थिक संकट ओढावलेल्या श्रीलंकेत एक दिवस पुरेल एवढेच पेट्रोल शिल्लक होते. या समस्येवर तोडगा काढत भारताने ४००० मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे.

श्रीलंकेत औषधांचा तुटवडा

भारताने डबगाईला आलेल्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्जही जाहीर केले होते. २ महिन्यांपूर्वी भारताने श्रीलंकेला ३६ हजार मेट्रिक टन पेट्रोल आणि ४० हजार मेट्रिक टन डिझेल पाठवले होते. एवढचं नाही तर आर्थिक संकट ओढवलेल्या श्रीलंकेत औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अत्यावश्यक औषधांची मदतही श्रीलंकेला केली होती. पेट्रोल आणि औषधांसह अन्नाचीही मदत भारताकडून करण्यात आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बुधवारी चेन्नईहून श्रीलंकेला मदतीसाठी रवाना करण्यात आलेल्या जहाजाला हिरवा झेंडा दाखवला.

श्रीलंकन ​​रुपयाची घसरण
भारताने या आगोदर २.७० लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त इंधन तेल श्रीलंकेला पाठवले होते. श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी संसदेत सांगितले की, पेट्रोलने भरलेल्या जहाजाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे अमेरिकन डॉलर नाहीत. श्रीलंकेतील ढासळत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेनंतर, डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन ​​रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे त्यावर विदेशी कर्जाचा भार वाढू लागला आहे.