Mehboon Mufti on De-Escalation : पहलगामविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत जाताना दिसतोय. ७ मेपासून दोन्ही देशांमध्ये सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. पाकिस्तानकडून होत असलेले हल्ले रोखण्यात भारताला यश येत असून भारतही पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहे. दरम्यान, दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा याकरता आता भारतानेच पुढाकार घ्यावा, अशी विनंती जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली.
एक्स पोस्टमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “मर्यादेच्या पलिकडे जाऊन अमेरिका भारत-पाकिस्तानच्या संघर्षात हस्तक्षेप करणार नाही, असं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनीही स्पष्ट केलंय. सध्याच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दोन्ही देशातील तणाव कमी करण्याकरता पाकिस्तान लष्कराशी संपर्क साधला आहे.”
तणाव कमी करण्याकरता पुढाकार घ्यावा
“सर्वाधिक मोठी लोकशाही असलेला भारत देश तसंच, सर्वाधिक लोकसंख्या असलेला आपला देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्थेच्या दिशेने पाऊल टाकत असताना आपण आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असता कामा नये. भारताने उपखंडातील नेतृत्त्वाची भूमिका स्वीकारून दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे”, असं आवाहन मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.
“जग आपल्याकडे पाहतंय. त्यामुळे हाच तो क्षण आहे, जिथं आपण जगाला सांगू शकतो की आपली खरी ताकद अण्वस्त्रांमध्ये नसून शांततेच्या वचनबद्धतेत आहे”, असंही त्या म्हणाल्या.