उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा २००२ निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून आपलं सरकार आणण्यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. यादरम्यान कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचं पारडं जड आहे यासंबंधी सर्व्हे केले जात आहेत. इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनकडूनही सर्व्हे करण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटरने मिळून हा सर्व्हे करण्यात आला आहे.

या सर्व्हेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? भाजपाला बहुमत मिळेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आजही कायम आहे का? ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे तिथे मोदींची लोकप्रियता किती आहे? यासंबंधीचे आकडे या सर्व्हेतून समोर आले आहेत.

आज निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा?

देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर ५४३ जागांपैकी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला २९७ जागा मिळतील. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीएला १२६ जागा मिळेल असा अंदाज आहे. तर इतरांना १२० जागा मिळतील.

पक्ष म्हणून पहायला गेल्यास भाजपा आजही सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असल्याचं चित्र आहे. आज निवडणूक झाल्यास भाजपाला त्यांच्या एकट्याच्या हिंमतीवर २७१ जागा मिळू शकतात. २०१९ लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास भाजपाला ३२ जागांचं नुकसान होईल. याचप्रकारे काँग्रेसला आज निवडणूक झाल्यास ६२ जागा मिळू शकतात. तर इतरांना २१० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी अजूनही सर्वात पुढे

सर्व्हेमध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी आजही पहिली पसंती असल्याचं दिसत आहे. ५३ टक्के लोक आजही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचं मानतात. फक्त ७ टक्के लोकांनी राहुल गांधींना पसंती दर्शवली आहे. ६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ आणि ४ टक्के लोकांनी अमित शाह यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिली आहे.

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळू शकतात ६७ जागा

उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जर आज लोकसभा निवडणूक झाली तर उत्तर प्रदेशात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ६७ लोकसभा जागांवर विजय मिळू शकतो. तर समाजवादी पक्ष १०, बहुजन समाज पक्ष २ आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात मोदींची रेटिंग टॉपला, पंजाबमध्ये नाराजी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी फार महत्वाची आहे. या राज्यातील लोकांना जेव्हा मोदींच्या कामकाजासंबंधी विचारण्यात आलं तेव्हा ७५ टक्के लोकांनी चांगलं असल्याचं सांगितलं. १६ टक्के लोकांनी खऱाब तर ९ टक्के लोकांनी सरासरी असल्याचं सांगितलं.

पंजाबबद्दल बोलायचं गेल्यास पाच राज्यांमधील हे एकमेव राज्य आहे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाजाला वाईट म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पंजाबमधील लोकांना मोदींच्या कामकाजाला रेटिंग देण्यास सांगितलं तर ३७ टक्के लोकांनी चांगलं तर ४४ टक्के लोकांनी वाईट आणि १६ टक्के लोकांनी ठीक असल्याचं म्हटलं.