Punjab Red Alert : पाकिस्तानला लागून असलेल्या भारतातील राज्यांना सर्वाधिक धोका आहे. राजस्थानसह पंजाबमध्ये सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी रात्री पंजाबच्या फिरोजपूरमध्ये झालेल्या संभाव्य ड्रोन हल्ल्यात तीन जण जखमी झाले. फिरोजपूरचे एसएसपी भूपिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पठाणकोटवर संशयास्पद ड्रोन देखील दिसले आणि सुरक्षा दल त्यांच्याशी सक्रियपणे संपर्क साधत होते. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

फिरोजपूर आणि पठाणकोटमध्येही स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. भारताने त्यांच्या हवाई क्षेत्रातून अनेक पाकिस्तानी क्षेपणास्त्रे रोखल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या निवासस्थानी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील १० सहकाऱ्यांना राज्यात काम करण्यास आणि सीमावर्ती भागात राहण्यासाठी नियुक्त केले. तसंच, जनतेच्या संपर्कात राहण्याचेही आदेश सरकारने नेत्यांना दिले आहेत.

चंदीगड विमानतळाभोवती हवाई हल्ल्याची भीती

अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मोहाली आणि पंचकुलासह चंदीगड विमानतळाभोवतीच्या भागात तातडीने इशारा जारी केला. यामध्ये रहिवाशांना संभाव्य हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. नागरिकांना घरातच राहण्याचा आणि खिडक्या किंवा दाराजवळ उभे राहण्याचे टाळण्याचा आणि अत्यंत आवश्यक नसल्यास बाहेर पडू नये असा सक्त सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी भारतीय शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लष्करी सुविधांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने प्रतिहल्ला सुरू केला तेव्हा हा इशारा देण्यात आला.

अमृतसर आणि फिरोजपूरमध्ये रेड अलर्ट

अमृतसरचे जिल्हा आयुक्त यांनी शहरात रेड अलर्ट जारी केला आहे. तुम्हाला थोड्याच वेळात सायरनचे आवाज येऊ लागतील. आपण रेड अलर्टवर आहोत. मी विनंती करतो की तुम्ही घरातच राहा. खिडक्यांजवळही उभे राहू नका. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर आम्ही याबाबत तुम्हाला कळवू. त्यामुळे कृपया शांत राहा आणि घाबरू नका”, असं आवाहन जिल्हा आयुक्तांकडून करण्यात आलं आहे.

फिरोजपूरमध्येही उपायुक्त दीपशिखा शर्मा यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. थोड्याच वेळात सायरनचा आवाज येऊ लागले, त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावं, प्रशासनाकडून घराबाहेर पडण्याबाबत हिरवा कंदील मिळत नाही तोवर नागरिकानी घराबाहेर पडू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.