आसाममधील जोरहाट येथे भारतीय वायू दलाच्या ‘एएन-३२’ या विमानाचा शनिवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात वायू दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. तर एक सह-वैमानिक गंभीर जखमी झाला आहे. सह-वैमानिकावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘एएन-३२’ हे भारतीय वायू दलाचे विमान जोरहाट येथील लष्करी तळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. प्राथमिक अहवालानुसार, विमान लँड होत असताना त्याला आग लागली. विमानाला आग लागल्यानंतर एअरबेसमधील आपात्कालीन सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांनी विमानाच्या दिशेने धाव घेतली. भारतीय वायू दलाचे ‘एएन-३२’ हे माल वाहतूक करणारे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती भारतीय वायू दलाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये दिली.

वायू दलाच्या ५ जवानांचा अपघातात मृत्यू

भारतीय वायू दलाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये अपघाताबाबत माहिती दिली आहे. “आसाममधील जोरहाट येथे झालेल्या विमान अपघातात ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायू दल या अपघाताबाबत तीव्र वेदना व्यक्त करते. स्क्वाड्रन लिडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टिनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्नीवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्नीवीरवायू दानिश आलम यांनी कर्तव्य निभावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. या दु:खद प्रसंगी भारतीय वायू दल जवानांच्या कुटुंबियांसोबत असून तीव्र संवेदना व्यक्त करते”, असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारतीय वायू दलाकडून ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश

या अपघाताप्रकरणी भारतीय वायू दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहे. अपघात का झाला याचे नेमके कारण तपासण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. विमानाला आग का लागली याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.