पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा निघेल, अशी भारताला अपेक्षा आहे. पण त्याचवेळी लष्कर कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील पूर्णपणे सज्ज आहे, असे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी मंगळवारी सांगितले.

“कुठल्याही संभाव्य घटनेचा सामना करण्यासाठी व्यूहरचनात्मक तयारी झाली आहे. देशाच्या उत्तर सीमेवर लष्कर पूर्णपणे सर्तक आहे” असे लष्कर प्रमुखांनी वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितले. “भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने नवीन टेक्नोलॉजीचा समावेश करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे” असे लष्करप्रमुख नरवणे म्हणाले. “दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही, हा भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे” असे लष्करप्रमुखांनी सांगितले.

“पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद सहन न करण्याचं आमचं धोरण आहे. आम्ही आमच्या मर्जीने, आमच्या वेळेनुसार, आम्हाला हव्या त्या ठिकाणी अचूकतेने प्रत्युत्तर देण्याचा आमचा अधिकार राखून ठेवला आहे” असे लष्करप्रमुखांनी सांगितले. सरलेल्या वर्षाबद्दल बोलताना म्हणाले की, “मागचे वर्ष आव्हानांनी भरलेले होते. आम्ही त्या आव्हानांचा सामना केला व सर्वोत्तम ठरलो. करोना व्हायरस आणि उत्तर सीमेवरील स्थिती ही दोन्ही मुख्य आव्हाने होती.”