सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर भारत सरकारने यासदंर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रश्दी यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – “मुख्यमंत्र्यांनी सही केली, आता…” अनिल पराबांचे दापोलीतील रिसॉर्ट जमीनदोस्त होणार? किरीट सोमय्यांनी केला मोठा दावा

“भारत नेहमीच हिंसाचार आणि अतिरेक्यांच्या विरोधात उभा राहिला आहे. आम्ही सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो आणि आम्ही त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो”, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असताना भारताने अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर १३ ऑगस्टरोजी पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना व्याख्यानापूर्वी त्यांच्यावर चाकूने हा हल्ला झाला. चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाच – “भाजपाकडून पंतप्रधानपदाची ऑफर…”; गौतम गंभीरचे अरविंद केजरीवालांना प्रत्युत्तर

मुंबईत जन्मलेले आणि बुकर पुरस्कार विजेते सलमान रश्दी यांचे ‘द सॅटॅनिक व्हर्सेस” नावाच्या पुस्तकास इराणमध्ये १९८८ पासून बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिमधर्मीय याला ईश्वरनिंदा मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा जारी केला होता. रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, रश्दी यांच्या पुस्तकावर बंदी घालणाऱ्या पहिल्या काही देशामध्ये भारतही होता.