India Pakistan War Tensions: भारतीय लष्करानं आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढला आणि पाकिस्तानच्या हद्दीत थेट १०० किलोमीटरपर्यंत आत शिरून एअर स्ट्राईक केला. मध्यरात्री दीडच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. यात जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैय्यबा व हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. या संपूर्ण कारवाईचा तपशील लष्करानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्यामध्ये १० प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.
भारतीय लष्करानं आज ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांचा बदला घेतल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. लष्करानंदेखील या पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ल्यातील मृतांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवल्याची माहिती दिली. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींना या मोहिमेची माहिती दिली.
पहिला मुद्दा: पहलगाम हल्ल्याचा वचपा…
मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांपासून १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ऑपरेशन सिंदूरअंतर्गत एअर स्ट्राईक करण्यात आल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं. हा हल्ला पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांनाच लक्ष्य करून करण्यात आला. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा उत्तर म्हणून हा एअर स्ट्राईक केल्याची भूमिका विक्रम मिस्री यांनी मांडली. दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी न्याय म्हणून एअर स्ट्राईक केल्याचं कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं.
दुसरा मुद्दा: अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर…
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी यावेळी एअर स्ट्राईकसाठी अत्याधुनिक व लक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याचं सांगितलं. यामुळे सामान्य नागरिकांची जीवितहानी टाळता आली. यासाठी विशिष्ट बनावटीची शस्त्रास्त्र वापरल्याचंही व्योमिका सिंह म्हणाल्या. शास्त्रसुद्धा पद्धतीने एअर स्ट्राईकसाठी लक्ष्य निश्चित करण्यात आले होते, असं त्यांनी सांगितलं.
तिसरा मुद्दा: पाकिस्तानी लष्करावर हल्ला नाही…
भारतीय लष्करानं केलेला एअर स्ट्राईक हा फक्त दहशतवाद्यांच्या तळांवर केलेला हल्ला असून पाकिस्तानी लष्करी तळांवर किंवा सामान्य नागरिकांवर हल्ले झालेले नाहीत, हे बारतानं स्पष्ट केलं आहे. भारतानं या कारवाईत फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्याचा संयम पाळल्याचं सांगतानाच व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून आगळीक झाल्यास उत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचा इशाराही दिला.
चौथा मुद्दा: कारवाईचं चित्रीकरण…
कर्नल कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत एअर स्ट्राईकच्या वेळचं व्हिडीओ फूटेज दाखवलं. त्याशिवाय, पाकव्याप्त जम्मू-काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील कोणत्या तळांवर एअर स्ट्राईक झाला, हे नकाशाद्वारेही त्यांनी समजावून सांगितलं. दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी किंवा लाँच पॅड म्हणून ज्या ठिकाणांचा वापर होत होता, अशीच ठिकाणं निवडल्याचंही कुरेशी यांनी सांगितलं.
पाचवा मुद्दा: एलईटी व जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त
भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग असणाऱ्या लष्कर ए तैय्यबा व जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची मुख्यालयं या एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झाल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यात जैशचं मुख्यालय असलेला बहावलपूर व एलईटीचं मुख्यालय असलेला मुरीदके या तळांचा समावेश आहे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाब व डेविड हेडलीलाही याच मुरीदके तळावर प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
सहावा मुद्दा: दहशतवाद्यांच्या व्यवस्थेचा सुगावा…
दरम्यान, गेल्या तीन दशकांमध्ये दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये मोठं जाळं उभारल्याचं कर्नल कुरेशी म्हणाल्या. यात नव्या तरुणांना कारवायांमध्ये जोडून घेणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांचं ब्रेन वॉशिंग करणारी केंद्रं, लाँच पॅड अशा सुविधांचाही समावेश आहे. पूर्ण पाकिस्तानभर व पाकव्याप्त काश्मीरमध्येही या सुविधांचं जाळं दहशतवाद्यांनी उभं केलं आहे. या एअर स्ट्राईकमुळे हे जाळं विस्कळीत करण्यात यश आल्याचं त्या म्हणाल्या.
सातवा मुद्दा: दहशतवादी तळांचा कसा लागला शोध?
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांचा सुगावा कसा लागला याची माहिती दिली. पहलगाम हल्ल्यानंतर हल्लेखोर व पाकिस्तानमधील त्यांचे म्होरके यांच्यातील मोबाईल संभाषण, द रेझिस्टंट फ्रंटसारख्या गटांच्या सोशल मिडिया पोस्ट यातून अधिक माहिती मिळत गेल्याचं ते म्हणाले. यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीचाही उपयोग झाला.
आठवा मुद्दा: जागतिक दहशतवादविरोधी मोहीम
मिस्री यांनी यावेळी भारतानं केलेला एअर स्ट्रईक दहशतवादविरोधातील जागतिक लढ्याचाच एक भाग म्हणून पाहिला जायला हवा असं म्हटलं. त्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जारी करण्यात आलेल्या निवेदनाचा त्यांनी दाखला दिला ज्यात दहशतवाद्यांना व त्यांना मदत करणाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली आहे. भारताने त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एअर स्ट्राईक केल्याचं सांगतानाच मिस्री यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तानला लक्ष्य केलं.
नववा मुद्दा: पहलगाम हल्ल्याचे संदर्भ…
यावेळी मिस्री यांनी पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेला हल्ला हा २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांवर झालेला सर्वात मोठा हल्ला ठरल्याचं नमूद केलं. दहशतवाद्यांनी कुटुंबीयांसमोर पर्यटकांना डोक्यात गोळ्या झाडल्या. पर्यटकांना जबर धक्का बसावा असाच यामागचा हेतू होता.
दहावा मुद्दा: भारताचा जगाला संदेश…
मिस्री यांनी आपल्या निवेदनात ऑपरेशन सिंदूर हे भारतावरील संभाव्या दहशतवादी हल्ले रोखण्यासाठीचं पाऊल असल्याचं नमूद केलं. पहलगामनंतर सीमेपलीकडून आणखी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे ते रोखण्यासाठी कारवाई करणं आवश्यक ठरलं, असं मिस्री म्हणाले. या हल्ल्यात फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं गेलं असून पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.