Indian Oil assures ample fuel and LPG stock across country amide India Pakistan Tensions : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला आहे. भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गुरूवारी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणांनी ही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केले. या तणावाच्या काळात लोक घरांमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. एलपीजी, पेट्रोल-डिझेल यापासून ते औषधे साठवून ठेवण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यादरम्यान इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे. याबरोबरच देशभरात त्यांच्याकडे पुरेसा इंधन साठा असल्याचेही सांगण्यात आले आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइलने म्हटले आहे की, “इंडियन ऑइलकडे संपूर्ण देशात पुरेसा इंधन साठा आहे आणि आमच्या पुरवठा लाइन्स सुरळीत सुरू आहेत. घाबरून जाऊन खरेदी करण्याची कसलीही आवश्यकता नाही. इंधन आणि एलपीजी आमच्या आउटलेट्सवर सहज उपलब्ध आहे. शांतता राखून आणि अनावश्यक गर्दी टाळून तुमची चांगल्या पद्धतीने सेवा करण्यास आमची मदत करा. यामुळे आमच्या पुरवठा लाइन्स कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील आणि सर्वांना अखंडपणे इंधन मिळत राहील.

गेल्या काही दिवसांमध्ये काही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजनंतर लोकांनी घाबरून जीवन आवश्यक वस्तू आणि इंधन खरेदी केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर सरकारने हा प्रकार फेटाळून लावला होता.

भारतात एकूण ९६,००० इंधन रिटेल आउटलेट आहेत जे ऑटोमोबाइल इंधन पेट्रेल-डिझेलची विक्री करतात. भारतात फक्त इंडियन ऑइलकडे ४०००० इंधन आउटलेट आहेत. त्यानंतर पब्लिक सेक्टर इंधन रिटेलर- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्याकडे सुमारे २४००० इंधन रिटेल स्टेशन आहेत. प्रायव्हेट सेक्टर कंपन्या जसे की रिलायन्स इंडस्ट्रीज, नायारा एनर्जी आणि शेल यांच्याकडे जवळपास ९००० इंधन स्टेशन्स आहेत.

एलपीजी किंवा घरगुती गॅस सिलेंडर बद्दल बोलायचे झाल्यास देशभरात याचे २५,००० डिस्ट्रीब्यूटर्स आहेत. यामध्ये फक्त इंडियन ऑइलकडे १३००० आउटलेट आहेत. तर उर्वरित भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडे आहेत

भारत – पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावादरम्यान देशातील काही भागात विशेषतः पाकिस्तानच्या सीमेलगतच्या राज्यांमधील काही भागात अन्न, इंधन आणि इतर जीवन आवश्यक वस्तूची घाबरून खरेदी केली जात असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या भागांमध्ये गुरुवारी रात्री पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आला होता. कारण या भागांमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण हे सर्व हल्ले भारतीय एअर डिफेन्स सिस्टम आणि सुरक्षा दलानी हाणून पाडले.