काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज(रविवार) उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथे सभेत बोलताना भाजपावर जोरदार निशाणा साधला. याचबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी याच्याबाबत बोलताना खळबळजनक विधानही केलं.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, “त्यांना(माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) माहीत होतं की त्यांची हत्या होणार होती. आजच्याच दिवशी जेव्हा माझा भाऊ आणि मी शाळेत जात होतो, रोज शाळेत जाण्या अगोदर आम्ही आमच्या आजीला भेटत होतो. आजच्याच दिवशी त्यांनी माझ्या भावाला सांगितलं होतं की, बेटा जर मला काही झालं तर रडायचं नाही. त्यांना माहिती होतं की त्यांची हत्या होऊ शकते, पण तरीही त्या कधीच मागे हटल्या नाही. त्यांच्याठी तुमच्या विश्वासापेक्षा जास्त या देशात, या जगात काहीच नव्हतं. तुमचा विश्वास होता आणि त्यांच्या हृदयात आपल्या देशाबद्दल विश्वास होता. आज जर मी तुमच्यासमोर उभी आहे, तर ही त्यांचीच शिकवण आहे. मी देखील तुमचा विश्वास कधीच तोडू शकत नाही.”

तसेच, यावेळी प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील निशाणा साधला. त्या म्हणाल्या “ दलित, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्यासह ब्राह्मण आदी सर्व वर्गांचे शोषण करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ हे गुरू गोरखनाथ यांच्या शिकवणीच्या विरुद्ध सरकार चालवत आहेत. हे सरकार दररोज लोकांवर हल्ले करत आहे. ”

याचबरोबर “लखीपूर खेरी येथे ज्या प्रकारे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या व्यथा कुणीच नाही ऐकल्या, हे या सरकारची वास्तविकता दर्शवते. हे दाखवते की या देशात शेतकऱ्यांची व्यथा कोणीच ऐकायला तयार नाही.” असंही यावेळी प्रियंका गांधींनी बोलून दाखवलं.